सुविचार व बोधकथा

आजचा सुविचार : कृती हवी, बडबड नको.
आजची बोधकथा:

वागण्याची पद्धत

आचार्य विनोबा भावे यांना भेटायला एक महिला आली.
ती म्‍हणाली,'' मी दु:खी आहे. माझा पती दारुडा आहे. रोज दारू पिऊन मला अपशब्‍द बोलत असतो आणि कधी-कधी मारहाणही करतो. माझे जीवन त्‍याने नरकासमान बनवले आहे.
'' विनोबांनी तिला विचारले,''तो जेव्‍हा दारू पितो तेव्‍हा तू काय करत असतेस?''
ती म्‍हणाली,'तेव्‍हा मला त्‍याचा खूप राग येतो. पहिल्‍यांदा मी त्‍याला फार वाईट बोलायची, परंतु त्‍याच्‍यावर कसलाही परिणाम होत नाही हे पाहून मी आता उपवास करणे सुरु केल आहे.''
विनोबांनी प्रश्‍न केला,''उपवासात खाणे-पिणे सर्व सोडून देतेस का?''
महिला म्‍हणाली,''नाही, फळे खात असते.''
तेव्‍हा विनोबांनी म्‍हटले,'' मग तर तुझा पती आणखीनच नाराज होत असेल, कारण की तुझ्या फळे खाण्‍यामुळे घरखर्चात वाढ होत असेल.''
हे ऐकताच महिला रडू लागली, तेव्‍हा विनोबा म्‍हणाले,'' रागाने किंवा जेवण सोडून दिल्‍याने कुणालाही चुकीच्‍या मार्गावरून हटवले जाऊ श्‍कत नाही. प्रेम तेच असते, जे आपल्‍यात निर्माण होते. मनात दुर्भावना असेल आणि प्रेमाचा देखावा केला तर त्‍याचा प्रभाव उलट होतो.''
महिला म्‍हणाली,''मी काय करुत्‍याला दारुच्‍या नशेत पाहून माझा माझ्यावर ताबा राहत नाही.''
विनोबांनी समजावले,'' हेच तर चुकीचे आहे, तू आपल्‍या पतीला वाईट मार्गापासून तेव्‍हाच रोखू शकशील, जेव्‍हा तू वाईट गोष्‍टींना समजून घेशील. त्‍याचा पहिल्‍यांदा प्रयत्‍न कर.''
महिलेच्‍या लक्षात आपली चूक आली की, क्रोधाने क्रोधाला जिंकले जाऊ शकत नाही. त्‍यावर प्रेमानेच विजय मिळविता येऊ शकतो हाच मार्ग मिळाल्‍याचा आनंद तिच्‍या चेह-यावर दिसू लागला.
तात्‍पर्य :- वाईट व्यक्तीची घृणा करत बसण्‍यापेक्षा वाईट वृत्ती कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत आणि हे कार्य दृढ इच्‍छा‍शक्तीनेच शक्‍य आहे.


आजचा सुविचार : जो विद्यार्थ्यांचे मन हळुवार फुलवून शिकवणे जाणतो, तोच खरा शिक्षक !!!
आजची बोधकथा
मनांतील अंतर
एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, ” आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का ?”सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो.” 
यावर साधुमहाराज म्हणाले, ''पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो,जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो”. 
यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दिले. ते म्हणाले, ” जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात. 
आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?” असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,” कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.

शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका. तसे होउ दिल्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही….

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा